वाचनामुळे प्रेरणा व आत्मविश्वास वाढीस मदत होते: कवी लवकुमार मुळे
राजे रामराव महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न
जत दि. 27 (प्रतिनिधी) महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांनी विविध विषयाचा अभ्यास व वाचन केले पाहिजे. आपण वाचले तरच लिहू शकतो. वाचनामुळे प्रेरणा निर्माण होऊन आत्मविश्वास वाढीस मदत होते, असे प्रतिपादन कवी लवकुमार मुळे यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे मराठी विभागाच्या वतीने आयोजित मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील हे उपस्थित होते.
अधिक बोलताना कवी लवकुमार मुळे म्हणाले की, मराठी भाषा गौरव दिन साजरा करीत असताना वाचनाच्या माध्यमातून एकमेकांशी सुसंवाद साधता आला पाहिजे. विविध प्रसार माध्यमामुळे मानवामध्ये सुसंवाद कमी झाला असून तो मानसिक आरोग्यासाठी धोका आहे. यावेळी त्यांनी विविध स्वरचित कविता गाऊन विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी विविध पुस्तकांचे उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये पुस्तकांचे महत्त्व विशद केले. कवी कुसुमाग्रज यांच्या विविध साहित्याचा आढावा घेऊन कुसुमाग्रजांच्या साहित्यातून प्रेरणा व ऊर्जा कशी निर्माण होते, याचे विवेचन केले. यावेळी वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ.राजेंद्र लवटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठी विभाग प्रमुख प्रा. कुमार इंगळे यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकात मराठी भाषेच्या आरंभीच्या पाऊल खुणांपासून ते आत्तापर्यंत निर्माण झालेल्या विविध साहित्याचा व लेखक-कवींचा आढावा घेऊन मराठी भाषेची प्रगती कशी होत गेली, हे सांगितले. कार्यक्रमाप्रसंगी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्ञानेश्वर कांबळे यांनी तर आभार प्रा. रेशमा लवटे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला प्रा. तेजस गवळी, प्रा. तुकाराम सन्नके, डॉ. सतिशकुमार पडोळकर, जुनिअर मराठी विभाग प्रमुख प्रा. दिनेश वसावे, प्रा. तडवी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#जनसागर
#जत
#प्रा. तुकाराम उमेश सन्नके
Comments
Post a Comment